भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे…
काश्मीर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सत्तावीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यातील सहा पर्यटक हे महाराष्ट्रातील होते. या घटनेनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा संतप्त नागरिकांनी दिल्या. त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा तातडीने पावलं उचलत अनेक निर्णय घेतले. त्यापैकी भारतामध्ये जे नागरिक शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून राहत आहेत त्यांना 48 तासाच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांची शोधाशोध आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांच्या माध्यमातूनही सुरू करण्यात आली … कल्याण डोंबिवली शहरात म्हणजेच झोन ३ मध्ये सध्या शॉर्ट टर्म व्हिसाच्या माध्यमातून शून्य नागरिक वास्तव्यास आहेत तर उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ विठ्ठलवाडी या परिसरात म्हणजेच परिमंडळ चार मध्ये एकूण 17 नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती झोन 4 चे डीसीपी सचिन गोरे यांनी दिली. लाँग टर्म व्हिसा बाबत अजून काही आदेश आले नाहीत.
आदेश आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल असेही गोरे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे हे सर्व नागरिक सिंधी समाजाचे आहेत. फाळणी नंतर तिथून निर्वासित होऊन आलेले सिंध प्रांतातील हिंदू, म्हणजेच आपण ज्यांना सिंधी म्हणतो ते लोक. काही सिंधी समाजाचे बांधव विशेषतः उल्हासनगर आणि इतर परिसरामध्ये वास्तव्यास राहिले. विस्थापित होऊन आल्यामुळे एकाच कुटुंबातल्या लोकांची फाटाफूट झली होती. मात्र त्यांचे काही नातलग हे पाकिस्तानात राहतात.
त्यानंतर पाकिस्तानातून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येण्याचा सिलसिला सुरू झाला. या नातेवाईकांना भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सिंधी समाजाचे लोक भारतामध्ये आले होते. या सर्वांना आता भारत देश लवकरात लवकर सोडावा लागणार आहे. झोन 4 मधील बहुतांश नागरिक हे रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी भारत सोडणार आहेत तर उर्वरित नागरिक हे 28 तारखेला पाकिस्तानच्या दिशेने रवाना होणार आहेत. जोपर्यंत लाँग टर्म व्हिसाबाबत केंद्र शासनाकडून काही निर्णय होत नाही तोपर्यंत अशा पाकिस्तानी नागरिकांना भारतात राहण्याची मुभा आहे.