दोन्ही संघांसाठी तिसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकली तर मालिका विजयाची मोहर लागेल. मात्र, इंग्लंडने पुनरागमन करत विजय मिळवल्यास पुढील सामन्यांना अधिक रंगतदार वळण मिळेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात अप्रतिम केली आहे. 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाकडे मोठी संधी आहे.
दुसऱ्या बाजूला, इंग्लंडसाठी हा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तगडी चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाने 22 जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर 25 जानेवारीला रंगतदार सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी आणखी मजबूत केली. चेन्नईत झालेल्या या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेलं 166 धावांचं आव्हान टीम इंडियाने 4 चेंडू राखून 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तिलक वर्मा या विजयाचा नायक ठरला. तिलकने 55 चेंडूत नाबाद 72 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.
टीम इंडियाची हॅटट्रिक की इंग्लंडचं पुनरागमन?
इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यांनी सामना सुरू होण्याच्या 24 तास आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर करत आपली तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकते की इंग्लंड बरोबरी करत मालिकेचा संघर्ष अधिक रंगतदार करते?
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.
तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.