अंबरनाथ : येथील आनंदनगर एमआयडीसीत श्री गणेश केमिकल्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजता मोठी आग लागली. त्यानंतर कारखान्यात रसायनाने भरलेल्या ड्रमचे एकामागून एक मोठे स्फोट झाल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. स्फोटामुळे आगीचा भडका उडून श्री गणेश केमिकल्सच्या शेजारच्या दोन कारखान्यांनाही आगीची झळ पोहोचली.
आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर तातडीने सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नसल्याचे एमआयडीसीचे अभियंता सुधीर कुंभार यांनी ‘मराठी न्यूज पोर्टल्स ला सांगितले. एमआयडीसी अग्निशमन केंद्राच्या दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.
तळोजा एमआयडीसी, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी साधारण साडेआठ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन सुरू केल्याचे कुंभार यांनी सांगितले. दाेन किलाेमीटरपर्यंत जाणवले हादरे संध्याकाळी एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांनी आनंदनगर एमआयडीसी हादरली.
श्री गणेश केमिकल्स कारखान्यात रसायनांचा मोठा साठा असल्याने स्फोटांची तीव्रता मोठी होती. स्फोटांचे हादरे दोन किलोमीटर अंतरावरील कारखान्यांमधील कामगारांना जाणवले. रसायनांच्या ड्रमचे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रसायन एमआयडीसीच्या रस्त्यांवर पसरले होते. तेथेही आग पसरली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी आल्या.
बघ्यांची गर्दी, पोलिसांची कसरत आग लागल्यानंतर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, स्फोट होऊ लागल्याने नागरिक सुरक्षितस्थळी धावू लागले. बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. काहीजण मोबाइलमध्ये आगीचे चित्रीकरण करत होते.

