भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत.
इतिहास
भारतीय जनसंघ (१९५१-७७)
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. and with this it become best
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
भारतीय जनता पार्टी(पक्ष) (१९८०-चालू)
जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता.
पक्षांतर्गत संरचना
या पक्षामध्ये ‘अध्यक्ष’ हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही.
मार्गदर्शक मंडळ
भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.या मंडळातील सद्य सदस्य
- लालकृष्ण अडवाणी
- मुरली मनोहर जोशी
- नरेंद्र मोदी
- राजनाथ सिंह
नॅशनल एक्झिक्युटिव्व्ह्ज
भाजपामध्ये “नॅशनल एक्झिक्युटिव्ह्ज” अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड आहे. त्याला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत.: ज्यात अमित शहा हे चेरमन, अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त यातील सद्य सदस्य (सन २०२०) :
- नरेंद्र मोदी
- राजनाथ सिंह
- वेंकय्या नायडू
- नितीन गडकरी
- थॅंवरचंद गेहलोत
- शिवराजसिंग चौहान
- जे.पी. नड्डा
- रामलाल
नॅशनल काऊन्सिल
भाजपामध्ये ‘नॅशनल काऊन्सिल’ नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो.

